खरे तर मधुमेह हा आजार नसून शरीराच्या पचय स्थितीत बिघाड झाल्याची अवस्था असते. मेहाचे बीज अनुवंशिकतेत असते. स्थूलपणा व मानसिक ताणामुळे ते चांगलेच रूजते आणि आहार-विहारांतील निष्काळजीपणामुळे चांगलेच फोफावते. आपण त्यावर कशा प्रकारे नियंत्रण ठेऊ शकतो हा उद्देश उराशी धरून माझा हा एक छोटासा प्रयास या पुस्तकरूपे आपल्यासमोर ठेवीत आहे. मधुमेही माणसाने 'आपल्याला मधुमेह आहे' हे मनोमनी स्वीकारणे हा त्यावर निम्मा विजय मिळवण्यासारखे आहे व त्यावर चिकित्सकांच्या द्वारे योग्य उपचार व पथ्यपाणी सांभाळून आनंदात जीवन जगता येते.