'जुन्या काळचे' म्हणजे साधारणपणे आपण १९०० ते १९५० हा काळ आपण धरू. त्या काळातले लेखक श्री. प्रभाकर श्रीपत भसे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी पूर्णपणे 'तत्वज्ञान' ह्या विषयावर आधारलेली आहे. त्यांनी त्यात मनोरमा ह्या एका स्त्रीच्यामार्फत तत्वज्ञान विषयक बोध सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. 'मनोरमा' ही छंद-व्यवसायाने एक लेखिका असते, वैद्यकी किंवा डॉक्टरीचाही तिचा अभ्यास चालू असतो, त्यातही तिचा आवडीचा विषय ' तत्वज्ञान ' असतो. मानवी जीवन-प्रवासात शील आणि संस्कृती ही मानवी जीवनाची प्रमुख अंगे आत्मसात करण्यासाठी आणि प्रत्येक पावलावर ती प्राप्त न झाल्यामुळे मानसिक स्वास्थ्याचा अभाव झाल्यामुळे प्रत्येकाची कशी मानसिक हेळसांड,तारांबळ उडते हे ती आपले आत्मचरित्र लिहूनच त्यातून त्या परिस्थितीचे दर्शन घडवते. हे पुस्तक ज्या काळी लिहिले गेले, त्या काळची तात्विक मराठी भाषेची भव्यता प्रदर्शित करण्यासाठी त्यात ठिकठिकाणी खूप अवघड किंवा अवजड मराठी भाषा वापरली गेली आहे उदा. साध्या 'भ्रम' ह्या शब्दा ऐवजी तिथे व्यामोह हा जड शब्द लिहिला आहे अशी ती मराठी भाषा आहे जी आजच्या 'मराठी' च भाषेत बोलण्याचा निर्धार केलेल्या व्यक्तिलाही कळण्यास वेळ लागेल.आणि राजरोस इंग्लिश भाषेतच बोलणाऱ्या मराठी व्यक्तीच्या नक्कीच डोक्यावरून जाईल. त्या भाषेत असंख्य ठिकाणी उपमा, उत्प्रेक्षा, वगैरे सारखी अलंकारिक मराठी भाषा वापरल्यामुळे त्यात 'भाषा भव्यतेचे' दर्शन घडते त्यामुळे साध्या-साध्या घटना प्रसंगीही तीच भाषा दिसल्यामुळे वाचकाची एकप्रकारे विनोदी करमणूक होऊ लागेल...आणि तो पोट आणि गाल दुखेपर्यंत हसेल. ह्या एकंदर अनुभवासाठी हे पुस्तक हातात घेऊन वाचण्यातच खरी मजा वाटेल..