Kathasaritsagar(कथासरित्सागर) Khand 1 to 5 By Durga Bhagavt & H.A.Bhave
गुणाढ्याने कथासरित्सागराची रचना शालिवाहन शकाच्या पहिल्या किंवा दूसऱ्या शतकात केली. आन्ध्र-सातवाहन युगात जळ-स्थळ मार्गावर अनेक सार्थवाह, नौकाधिपती व सफर करणारे व्यापारी रात्रंदिवस प्रवास करायचे. अशावेळी आकाशात तारे चमचम करीत असताना लांब रात्रीच्या वेळी त्यांच्या मनोविनोदासाठी कथांची रचना स्वाभाविकच होती. या कथात देशांतर करताना येणाऱ्या अनुभवाचे अमृत भरले जात असे. पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत, डोंगर, राने, गावे आणि नगरे यांच्या तिळतिळ भूमीवरून त्यांचे शकट सदा चालत रहायचे. त्याच प्रमाणे पूर्व आणि पश्चिम समुद्रात त्यांची जहाजे वाहात असायची. सातवाहन राजांच्या मुद्रांवर जलयानाचे चित्र अंकित केलेले आहे. हे चित्र त्यांचा सामुद्रिक व्यापार आणि दुसऱ्या द्वीपात संचार सुचित करते..... या उद्योगरत व्यापाऱ्यांच्या आणि नाविकांच्या अनुभवांचे गुणाढ्याने विलक्षण प्रतिभापूर्ण वर्णन या बृहत्कथेतल्या कथांच्या द्वारा केले आहे... बृहत्कथेच्या रूपात गुणाढ्याने जे साहित्यिक सत्र विक्रमाच्या प्रथम शतकात चालू केले ते वाङ्मयाचे सहस्त्र-संवत्सर सत्रच झाले. संस्कृत प्राकृतातल्या अनेक प्रतिभावंत रचनाकारांनी त्यात भाग घेतला. सोमदेवाचा कथासरित्सागर या विकासाची अखेरची पायरी आहे.