Kabir Charitra Va Dohe by H A Bhave

Regular price Rs. 250.00
Sale price Rs. 250.00 Regular price
कबीर : चरित्र व दोहे

या पुस्तकात कबिराचे चरित्र व महत्त्वाचे दोहे दिले आहेत. तुकारामांच्या अभंगाप्रमाणेच कबिराच्या दोह्यातील अनेक चरण म्हणीरूप झाले आहेत. तुकाराम महाराज ज्या प्रमाणे 'तुका म्हणे' असा उल्लेख करतात त्याचप्रमाणे अनेक दोह्यात 'कबीर कहे' किंवा 'कहत कबीर' असा उल्लेख असतो. तुकाराम, रामदास यांच्याप्रमाणे कबिराला गुरू असा कोणीही नाही. त्यांचे गुरू रामानंद नावाचे साधू होते असे मानतात. पण त्याला आधार नाही. कबीर हा उपदेश करीत, प्रवचने करीत फिरणारा होता. खऱ्या अर्थाने तो जनतेचा कबीर होता. कोणी कोणी कबिराला नाथपंथी मानतात. पण त्यासही आधार नाही. कबिराचे दोहे व काव्य खरोखर चिंतनगर्भित व विचारगर्भित आहे. कबीर आपल्या अवतीभोवतीच्या समाजाचे बारकाईने निरिक्षण करतो व त्यातूनच त्याचा उपहास जन्म घेतो. दोह्यातील अनेक प्रमुख विधाने सुभाषितरूप झाली आहेत. ही सुभाषितरूप झालेली वचने मुख्यतः कबिराच्या दोह्यातच आहेत. कबीर अनेक लोकसमुहामध्ये फिरलेला व वावरलेला असल्यामुळे जनतेच्या तोंडची रूढ भाषाच त्याच्या दोह्यात येते, म्हणूनच कबिराच्या दोह्यामध्ये ब्रज भाषा, फार्शी, उर्दु, खडीबोली, अवधी, पंजाबी, भोजपुरी इतकेच काय मराठी भाषेतील शब्दही सहजपणे येतात. 'कबीर आपले दोहे प्रवचनात गाऊन दाखवत असे' असे म्हणतात. कबिराचे काव्य कोणत्याच भाषेशी जोडलेले नाही. शिखांना पवित्र असलेल्या ग्रंथसाहेबातसुद्धा कबिराचे दोहे, रमय्या व इतर रचना समाविष्ट केलेल्या आहेत. सामान्यजनाचेच अनुभव कबीर आपल्या काव्यात सांगतो म्हणून तो एके ठिकाणी म्हणतो,'कबीर खडा बाजारमे', म्हणजे बाजारात उभा राहून कबीर जनसामान्यांचीच भाषा बोलत होता.

कबिराचे दोहे इतके आकर्षक व हृदयाला भिडणारे आहेत की आपण त्याचा मराठी अर्थ वाचताना सुद्धा त्यात अगदी एकरूप होऊन जातो. या दोह्यात खरोखर नाट्य भरपूर भरलेले आहे. या दोह्यातून कधी-कधी कबीर समोरच्या श्रोत्यांशी बोलत आहे असाच भास होतो. यात मनाला जाऊन भिडणारी छोटी छोटी रूपकेही अतिशय समर्पक आहेत. कबिराची कविता वाचताना त्याचा, उत्कट भक्ती करणारा स्वभाव आपल्याला जाणवतो. गंभीर तत्त्वज्ञान सांगताना सुद्धा कबिराच्या स्वभावातील मिश्किल खट्याळपणा आपल्याला जाणवतो. कितीही खट्याळपणा केला तरी कबिराचा गंभीरभाव व तत्त्वज्ञान डोळ्यातून कधीच नष्ट होत नाही. ज्ञानेश्वरी विषयी एकनाथ महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी समजण्यासाठी ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी लागते त्याचप्रमाणे प्रत्येक वाचकाने कबिराचा एकतरी दोहा अनुभवून पहावा असे सांगावेसे वाटते.