भारतीय गणिती या पुस्तकात पहिला आर्यभट, ब्रह्मगुप्त दुसरा, भास्कराचार्य आणि रामानानुजम् अशा चार भारतीय गणित शास्त्रज्ञांची चरित्रे दिली आहेत. प्रत्येक चरित्रात त्या व्यक्तीचे जीवनचरित्र, त्याने लावलेले शोध व त्याची योग्यता, अशा क्रमाने माहिती दिली आहे. ब्रह्मगुप्त 1400 वर्षांपूर्वी होऊन गेला; तर भास्कराचार्य 800 वर्षांपूर्वी होऊन गेला; म्हणून त्यांच्या चरित्राबद्दल पुराव्यानिशी माहिती फारच कमी मिळते. तरीही शक्य जिततकी जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात ठिकठिकाणी संस्कृत अवतरणे दिली आहेत. तसेच काही उदाहरणे व त्यांच्या रीती दिल्या आहेत. तरीही फार किचकट होऊ नये याची काळजी घेतली आहे. हे पुस्तक वाचल्यावर भारतीयांना, अंक - पद्धती, अंकगणितातील अष्टकर्मे, बीजगणितातील शोध यांची किती माहिती होती हे समजेल. तसेच पायथॅगोरसचा सिद्धान्त, पृथ्वीचे अक्षभ्रमण, गुरुत्वाकर्षण इत्यादी गोष्टींचे ज्ञान भारतीयांना होते, हे वाचून वाचकांना आश्चर्य वाटेल आणि गणित शास्त्रात प्राचीन काळापासून भारतीयांची किती प्रगती झाली होती. त्याचे योग्य ज्ञान होईल. या पुस्तकाचे लेखक प्रा. ना. ह. फडके संस्कृतचे गाढे पंडित असून मुंबई विद्यापिठात गणिताचे प्रमुख प्राध्यापक होते. त्यांचे हे महत्त्वाचे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा वरदा प्रकाशनाने सादर केले आहे.